कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन छेडण्याचा इशारा
मुंबई । एसटी ही अनेक प्रवाशांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र कडकडत्या उन्हात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास होळीच्या तोंडावर एसटी संप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ शकतात.
होळी सणामुळे अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास ग्रामीण भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
2018 पासूनची थकबाकी अद्याप प्रलंबित
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वार्षिक वेतनवाढ लागू आहे. मात्र, 2018 पासूनचा महागाई भत्त्याचा फरक आणि अन्य थकबाकी अद्याप मिळालेली नाही. न्यायालयाने थकबाकी देण्याचा आदेश दिला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता दिला जात असला, तरी एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 43 टक्के भत्ता मिळत आहे. (MSRTC strike)
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या
53% महागाई भत्ता त्वरित लागू करावा.
2016 ते 2021 पर्यंतच्या घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची थकबाकी अदा करावी.
जाचक शिस्त आणि आवेदन प्रक्रिया रद्द करावी.
आरटीओ विभागाकडून चालकांवर होणारी अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवावी.
एसटी ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारकडून पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.