सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; शेतकरी अडचणीत
जळगाव : सोयाबीनची काढणी झाल्यानंतर शेतकरी आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आणू लागला आहे. दिवाळीमुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. मात्र दरात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुळात हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे.
राज्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात भिजला होता. तसेच सोयाबीन काढणीला देखील उशीर झाला होता. मात्र सोयाबीन काढणी झाल्यानंतर शेतकरी लागलीच विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये आणत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये नाफेडने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले.
मात्र मार्केटमध्ये सोयाबीनला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा देखील कमी भाव मिळत असल्याचं दिसत आहे. सद्यस्थितीत सोयाबीनला हमीभाव पेक्षाही कमी दर मिळत असून तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपये दरात ओलावाचे कारण सांगून खरेदी केली जात आहे.