संकटाच्या काळात महाराष्ट्राला मोठी मदत; केंद्राकडून राज्याला 6418 कोटी रुपये, पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळणार?
मुंबई । केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण १० ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे.
या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी व विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, गुरेढोरे वाहून गेली. घरं उद्वस्त झाली आहेत. संकटात सापडलेला बळीराजा सरकारकडू मदतीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 6418 कोटी रुपये मिळाल्याने हा निधी तात्काळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापर जाणार का हे पहावं लागेल.