मान्सूनआधीच वादळी पाऊस झोडपणार, राज्यातील २८ जिल्ह्यांना अलर्ट
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान
खात्याने मान्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी अद्यापही मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हेच चित्र राज्यात कायम राहणार आहे. १५ मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.