शेतीपिकांवर परिणाम होणार! राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा
मार्च महिना सुरू झाल्यापासून उकाडा वाढला असून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ दिसून आली. मात्र या आठ्वड्यात हवामानात अनपेक्षित बदल झाला. कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पूरक हवामान तयार होत आहे. हवामान खात्याने विदर्भासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतीपिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात गारपीट आणि यलो-ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे. या भागात वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते जोरदार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.
उर्वरित महाराष्ट्रात हवामान स्थिती
मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पूरक हवामान तयार होत आहे