एक रुपया पीक विमा योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतक-यांसाठी महत्त्वाची असलेल्या एक रुपया पीक विमा योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले. सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील काळात पीक विमा योजना चालवत होतो, त्यामध्ये अनेक घोटाळे पाहायला मिळाले. एक रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज या पाहायला मिळाले. हजारो कोटींचा अपव्यय होतोय, अशी षड्यंत्र लोकांनी केले. गरजू शेतकरी ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करुन सुधारित पद्धतीने योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपनीचा लाभ होऊ नये तर शेतक-याचा लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारे ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, वेगवेगळ्या प्रकारे, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यात गुंतवणूक वाढवायची यासाठी स्वतंत्र योजना मंत्रिमंडळाने मान्य केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नेमका निर्णय काय?
सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवण्यात येईल. तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवली जाणार आहे.