आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

0

मुंबई । आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारला पावसाळी अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करत विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान त्यापूर्वी बुधवारी सरकारकडून पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला.‘लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील त्यांच्या फुगलेल्या छातीची हवा काढण्याचे काम जनतेनं केलं आहे, त्यांचे विशेष अभिनंदन आहे. जनाधार गमवलेल्या या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे’ असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मात्र या मागणीला विरोध होत आहे. या मुद्द्यावरू विरोधक विधानसभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जून संपत आला तरी विदर्भातील अनेक भागांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे, हा मुद्दा देखील पावसाळी अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई यावरून देखील अधिवेशनात खडाजंगी होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.