जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये रुजवली जातेय राष्ट्रभक्ती

0

जळगाव | कारागृहातून परत समाजात आल्यानंतर एक चांगला नागरिक बनून समाजहितासाठी कार्य करावे, यासाठी जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्याचा उपक्रम मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेने राबवला. त्यात सहभागी स्पर्धकांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक यु. टी. पवार, जिल्हा न्यायाधीश एस. एन. राजूरकर, कारागृहाचे अधीक्षक ए. आर. वांढेकर यांनी कौतुक करून प्रोत्साहित केले. यावेळी संस्थेचे प्रमुख अशोक शिंदे हेही उपस्थित होते.

कारागृह प्रशासनाच्या सुधारणा व पुनर्वसन कार्यात सहभाग देत रामचंद्र प्रतिष्ठानने जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये समाज आणि देशहिताबद्दलचे विचार काय आहेत, समाजात आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता चांगल्या कामातून स्थैर्य मिळवावे, या दृष्टीकोनातून त्यांचे विचार समजून घेण्यासाठी स्पर्धा आयोजित केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सहभागी स्पर्धकांचे मूल्यांकन करून उत्तम स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले तसेच संस्थेला प्रशंसापत्रही सुपूर्द करून असे उपक्रम भविष्यातदेखील राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या वतीने भविष्यातदेखील नियमितपणे असे उपक्रम जळगाव जिल्हा कारागृहात राबविण्यात येणार आहेत तसेच शिक्षा भोगून कारागृहातून सुटका झालेल्या बंदिवानांना स्वावलंबी करुन समाज आणि देशहितासाठी कार्यरत करण्यासाठी त्यांचे कौशल्य आणि गुणवत्ता ही राष्ट्रीय कार्यासाठी उपयोगात यावी, यासाठी बंदिवानांचे सुधाऱणा आणि पुनर्वसन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कारागृहांमधील बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजावी तसेच त्यांनी समाजात आल्यानंतर चांगले कार्य करून आपली प्रतिमा निर्माण करावी आणि मुख्य प्रवाहात सामील व्हावी, यासाठी २०१८ पासून रामचंद्र प्रतिष्ठान प्रयत्नशील असून संस्थेला केशवस्मृती सेवा समूहाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार २०२४ मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात प्रदान करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.