महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्गांची घोषणा ; जळगावलाही होणार फायदा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्गांची घोषणा केली. गोंदिया-बल्लारशाह, जळगाव-जालना मार्ग आणि मुंबईत एसी लोकल सेवा सुरु केल्या जातील अशी घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आलीय. याशिवाय, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारेल आणि विशेषतः विदर्भाला मोठा फायदा होईल, असे सांगितले.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी एसी लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल. वैष्णव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे वेगाने विस्तारण्यावर भर दिला जात आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. गोंदिया बल्लारशाह हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर विदर्भाला जास्त फायद होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर विदर्भातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. मुंबईसह राज्यभरात अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील प्रवास सुलभ होईल आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.