नंदुरबार । ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. पक्षश्रेष्ठींकडून विश्वासात घेतलं जात नसल्यानं पादाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येत असून निवडणुकीत याचा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याच्या घाट जयंत पाटील यांनी घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत. जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहे. असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असंही या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्यानं याचा मोठा फटका हा जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे आता या संदर्भात पक्ष काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.