पुणे । “पवार साहेब एक पाऊल मागे आले असतील, तर आम्ही महाविकास आघाडी टिकावी म्हणून तीन पावलं मागे आलो अशी भूमिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसला पुण्यात पराभव पत्कारावा लागला. या स्थितीचे मंथन करण्यासाठी पटोले यांनी शहर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आघाडीतील घटक पक्षांकडून विधानसभेची तयार सुरू करण्यात आली आहे. राज्यात आपल्याच पक्षामुळे भाजप-महायुतीला रोखण्यात यश आल्याचा दावा आघाडीचे सर्वच घटक पक्ष करत आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील “लोकसभेला आपण महाविकास आघाडी टिकावी, म्हणून एक पाऊल मागे आलो. त्यामुळे आम्हाला कमी जागा मिळाल्या. आता विधानसभेला आपल्याला जास्त जागा मिळाव्यात,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काॅंग्रेसच महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढविणार असल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.
पटोले म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय पक्ष असून ज्या प्रकारे आम्ही शोषित पीडित लोकांना सोबत घेऊन चालतो. तसंच अन्याय आलेले जे पक्ष भाजपविरोधात लढतात, त्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची राहिली आहे. राज्यात सरकारला सत्तेतून पायपायउतार करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत राहून मेरिटच्या आधारावर जागावाटप करून बहुमताचे सरकार महाराष्ट्रात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.’
सर्वांना बोलण्याचा अधिकार
जागा वाटपात विधानसभेसाठी सर्वांना जास्त जागा हव्या आहेत. त्याबाबत लवकरच बैठक होउन निर्णय घेतला जाईल, मात्र, अद्याप तरी जागा वाटपाचा कोणताही फाॅर्म्युला निश्चित झालेला नाही. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या जागांची मागणी करत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्तेही कसबा विधानसभा मतदारसंघाची मागणी करत आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवर ते निर्णय घेतले जातील, असेही पटोले म्हणाले.