मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे ; म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २३ मार्च २०२६ रोजी भेट घेतली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव यशवंत देसाई, अरुण नाईक आदी उपस्थित होते.