मुंबईकरांसाठी खुशखबर ! मान्सून दोन दिवसाआधीच मुंबईत धडकला
मुंबई । वेळेआधी दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्र हळूहळू व्यापात आहे. अशातच मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात मान्सून शहरात दाखल झाला आहे. दोन दिवसाआधीच मान्सूनचं मुंबईत आगमन झालं आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. येत्या ३-४ तासांत मुंबईत ढग दाटून येणार असून तुफान पाऊस कोसळणार, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत दरवर्षी सर्वसामान्यपणे ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून शहरात दाखल झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आता हळूहळू मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे मुंबईकरांची आता उकाड्यापासून कायमचीच सुटका होणार आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. रविवारी पहाटे मुंबईसह उपनगरात अचानक पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हवेत गारवा पसरला. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचलं.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील रस्त्यावर तसेच पूर्वेकडील शिवाजीनगर आणि एस्स वी रोडवरील पेट्रोल पंपसमोर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जमा झालं. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दुसरीकडे या पावसाचा फटका लोकल ट्रेनला देखील बसला. ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक १० ते १२ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे कामावर निघालेले चाकरमानी चांगलेच ताटकळले होते. दरम्यान, मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याने येत्या ३-४ तासांत शहरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.