आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रीमंडळात स्थान द्या – पांडुरंग वारुंगसे..
इगतपुरी ।
सिन्नरच्या विकासासाठी भरीव योगदान देऊन पूर्वभागाचा तसेच इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील दुष्काळ हटविण्याचे करणाऱ्या काम आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन ‘दादांनी आपला वादा’ पूर्ण करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे. सिन्नर तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. पूर्वभागात आपल्या कर्तबगारीतून देवनदीचे पाणी पूरचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचवण्याचे काम आमदार कोकाटे यांनी केले आहे. यासाठी दूरदृष्टी व इच्छाशक्ती आवश्यक होती, ती कोकाटे यांच्याकडे होती. पूर्वभागात पाणी आल्याने हा भाग अतिशय सुजलाम सुफलाम होत आहे. तसेच तालुक्यात बांधलेल्या विविध शासकीय इमारती या अतिशय दर्जेदार असून, यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहे.
मागील पाच वर्षांत आमदार असतांना माणिकराव कोकाटे यांनी इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटात नेत्रदिपक कामगिरी केली आहे. टाकेद गटातील रस्ते, विज, पिण्याचे पाणी आदी विकासकामे केलेली आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकासान झालेले असतांना त्यांना पिकविम्याच्या माध्यमातुन भरीव मदत मिळवून दिली होती. इगतपुरी तालुक्यातील टाकेद गट हा विधानसभेला सिन्नरला जोडलेला असुन या गटाचा विकास आमदार कोकाटे यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत विधानसभा तालुक्यातून विकासाच्या मुद्यावर आमदार माणिकराव कोकाटे यांना १ लाख ३८ हजारांहून अधिक मते मिळाले असून, विरोधी उमेदवारावर त्यांनी ४० हजार ८८४ मतांची आघाडी घेतली आहे. सिन्नरला जेव्हा जेव्हा अजितदादा आले तेव्हा तेव्हा त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्री करतो, असे सांगून हा दादांचा वादा असल्याचेही निक्षून सांगितले आहे, अशी आठवणही तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी करून दिली आहे. म्हणुन आमदार कोकाटे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी वारुंगसे यांनी केली आहे.
मतदार संघाचा विकास करण्याचे काम आमदार कोकाटे यांनी केले आहे. नदीजोड प्रकल्पास गती देण्यासाठी व इंडियाबुल्स प्रकल्प सुरू करण्यासाठी कोकाटे यांच्यासारख्या व्यक्तीस मंत्रिपद मिळणे गरजेचे असून, ते आपल्या कर्तबगारीतून मतदारसंघाबरोबरच जिल्ह्याच्या विकासाला न्याय देतील, अशी भावना अण्णासाहेब गडाख यांनी व्यक्त केली आहे.
— पांडुरंग वारुंगसे, तालुकाध्यक्ष, इगतपुरी