अखेर मंत्रीमंडळ अन् खातेवाटपाचा तिढा सुटला, कोणाला काय मिळणार?
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा तिढा आता संपल्याच जमा आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.
या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं येणार, याचा अंतिम निर्णय झालेला आहे. तर आज मुंबईत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे 14 डिसेंबरला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपद मिळणार?
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमध्ये भाजपच्या वाट्याला 20, शिवसेना 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळू शकतात. त्यामुळे आता याबाबत अंतिम घोषणा कधी होणार, हे पाहावे लागेल. मात्र, आता खातेवाटप कसे होणार, याची अधिक उत्सुकता सर्वांना लागली आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह, महसूल आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. मात्र, ही महत्त्वाची खाती भाजप एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार दिला जाणार का, हेदेखील बघावे लागेल. मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर आज काय प्रतिक्रिया दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बुधवारी रात्री दिल्लीत शहांची घरी खलबतं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दिल्लीला गेले होते. काल रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि जे.पी. नड्डा या तिघांची बैठक झाली. ही बैठक रात्री उशीरा संपली. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत खलबतं सुरु होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपच्या कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात घ्यायचे, याबाबतही चर्चा झालेली आहे. देवेंद्र फडणवीस हे बैठक उशीरा संपल्याने रात्री दिल्लीतच थांबले. आता गुरुवारी ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे.