विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीने आपल्या जागा वाटपाबाबतची चर्चा पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत निश्चित केलीय. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपांचा तिढा कायम आहे. यावर निर्णय घेण्यासाठी आता डेडलाईन ठरवण्यात आलीय.
सप्टेंबर महिनाअखेर जागावाटपाची चर्चा पूर्ण केली जाणार असून ज्या जागावर तिढा आहे, त्याचा तोडगा अमित शहा यांच्या दरबारी निघणार असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्यात. या बैठकीत ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अशा जागांबाबत चर्चाही झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत. अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही हा तिढा शहांच्या दरबारी सुटेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीवेळीही जागावाटपाचा तिढा होता,आणि हा तिढा अमित शहा यांनी सोडवला होता.
महामंडळ जागा वाटपसंदर्भात चर्चा
दरम्यान आज महामंडळ जागा वाटपसंदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. महामंडळ वाटप करताना भाजप आणि एनसीपी पक्षाच्या कोट्यातील महामंडळ वाटप लवकर करावे ही भूमिका आहे. पण अंतर्गत पक्षात वाद नको यामुळे महामंडळ जागा वाटप करावे का? याबाबत अजित पवार त्यांच्या नेत्यांसोबत संवाद करण्याची शक्यता आहे.
एनसीपी पक्षाच्या कोट्यात असलेल्या महामंडळांचे वाटप लवकर, करावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. एक-दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील आमदारांना महामंडळाचे वाटप करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय असलेल्या आमदारांना महामंडळं देण्यात आलीत. हेमंत पाटील यांना बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपद देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. तर अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. तर संजय शिरसाट यांची नियुक्ती सिडको अध्यक्षपदी करण्यात आली. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे राज्यमंत्री दर्जा देण्यात आला.