दहावी परीक्षेचा निकाल या दिवशी लागणार ; शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितली तारीख
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10 वीच्या निकालीची विद्यार्थी वाट पाहत आहेत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी दहावीचे निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली. दहावीचा निकाल 27 मे पर्यंत लागू शकेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
“बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारल्याने आनंद आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबरला आहे बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोदर जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान होणे बाकी होते. त्यामुळे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला,” असे दीपक केसरकर म्हणाले.