राज्यपालांमध्ये मोठे फेरबदल; जिष्णू देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल

0

मुंबई । देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रात्री अचानक देशातील विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील राज्यपाल, नायब राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?

ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून जिष्णू देव वर्मा ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत ते या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासा यांसारख्या खात्यांची जबाबदारी होती.

तसेच जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांचा जन्म १५ अॅागस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या सक्रीय राजकारणाला सुरुवात झाली. १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्रिपुरा राज्यात डाव्या पक्षांचे वर्चस्व असताना जिष्णू देव वर्मा यांनी भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे.

राजकारणाबरोबरच जिष्णू देव वर्मा कलाप्रेमी आहेत. त्यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. याशिवाय ते बॅडमिंटन खेळाशीही जोडलेले असून क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.