लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्रात भाजपात मोठे फेरबदल होण्याचे संकेत
मुंबई । लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कंबर कसली आहे.
केंद्रीय पातळीवरुन त्यासंदर्भात पावले उचलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून भूपेंद्र यादव तर सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् मुंबई अध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमित शाह यांचे विश्वासू आणि अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देणारे भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे विश्वासू रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी नेमण्यात आले आहे. ही जोडी मध्य प्रदेश विधानसभेत प्रभारी अन् सप्रभारी होती. त्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेत भाजपला दणदणती बहुमत मिळाले होते.