खड्ड्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू ; जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव | जळगाव जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याच दरम्यान जळगाव तालुक्यातील कडगाव-जोगलखेडा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष यादव धनगर वय-५५,रा.कडगाव ता. जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव येथे संतोष धनगर हे शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. शेतीकाम व पशुपालन करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी ते म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या. पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता, त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान या रस्त्याने गावातील ग्रामस्थ ये जा करत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप व्यक्त केला होता जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान रात्री ११ वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा जयेश असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हाड हाड व्यक्त केली जात आहे.