राज्यात अवकाळी पावसाचे संकट ; जळगाव जिल्ह्यातही ९ मे पर्यंत पावसाचा अंदाज
जळगाव । महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान 40 अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे उन्हाची दाहकता वाढली असून उष्णतेने नागरिक हैराण झाले. मात्र त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट समोर आले आहे. गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातही ९ मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आगामी काही दिवस सायंकाळच्या वेळेस ३० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात ७ मेपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजेनंतर काही महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडण्याच्या आवाहनदेखील करण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून सातत्याने कडाक्याचे ऊन असल्यामुळे जळगावकर उकाडा व तीव्र उष्ण लाटांनी हैराण झाले आहेत. त्यात आता आगामी काही दिवस पावसाचे असल्याने जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळू शकतो. मात्र, या अवकाळी पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहणार असल्याने विशेष काळजी घेण्याचीही गरज राहणार आहे.
आगामी पाच दिवस कसे राहणार वातावरण….
दिनांक.. तापमान आणि वातावरणाची स्थिती
५ मे – तापमान ४० अंश….. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि जोरदार वारे (३०-४० किमी प्रतितास)
६ मे – तापमान ४१ अंश….. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस
७ मे – तापमान ३८ अंश….. ५० ते ६० किमी वेगाने वादळी वान्यांसह पाऊस
८ मे- तापमान ३७ अंश….. काही अंशी ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पाऊस
९ मे – तापमान ३७ अंश… गडगडाटासह काही अंशी पाऊस