जळगाव ते मनमाड चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शेतकरी, युवक, नवोपक्रम, रेल्वे यासह अनेक गोष्टींशी संबंधित होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगाव ते मनमाड या स्थानकादरम्यान चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी देण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माहिती देताना म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करताना मध्य प्रदेशशी संपर्क वाढवणे तसेच मुंबई-प्रयागराज-वाराणसी कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गतच जळगाव-मनमाड चौथी लाइन, भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी लाइन आणि माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाइनसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
मनमाड-जळगाव १६० किलोमीटर मार्गालासाठी 2773 कोटी रुपये तर भुसावळ-खंडवा दरम्यान 131 किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 3514 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. प्रयागराज-माणिकपूर दरम्यान 84 किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. यासाठी 1640 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
या तीन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे ७,९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार व अवधचा भाग महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. तसेच प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प रेल्वेगाड्यांचे परिचालन सुलभ करतानाच गर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही वैष्णव यांनी व्यक्त केला.