१२वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव । बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्याचा दोर कापला. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात येथे घडली. ऋषिकेश दिनेश पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
ऋषिकेश दिनेश पाटील ममुराबाद येथे आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत राहत होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी (दि.५ मे) दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात त्याला केवळ ४९ टक्के गुण मिळाले, जे त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. त्यामुळे तो मानसिक तणावात गेला.
निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच दुपारी सोमवारी (दि.५ मे) दीडच्या सुमारास ऋषिकेशने घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब आईच्या लक्षात येताच त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऋषिकेशचे वडील शेतीकामासोबतच रसवंती गाडा चालवतात, तर मोठा भाऊ फार्मसी शिक्षण घेत आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या अशा अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही शोककळा पसरली आहे.