जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू
जळगाव | उष्णतेचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. रस्ते डागडुजी, बांधकाम रोजगार हमी यासह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटा पाहता आरोग्य विभागाने पण नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ३ जूनपर्यंत कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. ज्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करावे किंवा कूलरची व्यवस्था करावी, असे आदेश काढले आहेत. याबाबत काही एक तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलिस विभागाकडे करता येणार आहे.
खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. त्यानंतर कोचिंग सेंटर सुरू ठेवायचे असल्यास त्यात पुरेसे पंखे, कूलरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.