यावल तालुक्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू
यावल । तालुक्यातील मनवेल येथील ७० वर्षीय शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही महिला गुरुवारी दगडी शिवारातील त्यांच्या शेतात काम करत होती. दुपारी त्यांना शेतात अत्यवस्थ वाटू लागले. घरी आल्यानंतर काही वेळाने त्यांचा बेबाबाई बोरणारे मृत्यू झाला. मनवेल येथील बेबाबाई मोहन बोरनारे (वय ७०) ही महिला दगडी शिवारात स्वतःच्या शेतात गेली होती.
तेथे त्या मुलगा, सून यांच्यासोबत काडी कचरा वेचत होत्या. वाढत्या तापमानाच्या फटका बसल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या काम सोडून घरी आल्या. यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज आहे. मृत महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी (दि.२४) सकाळी ९ वाजता मनवेल येथे अत्यंस्कार होतील, त्या मोहन मोतीराम बोरनारे यांच्या पत्नी, तर किजय बोरनारे यांच्या आई होत.