मुख्यमंत्री पदाचे चेहरे आणि मोहरे
महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. बहुधा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अटीतटीची तसेच निकराची ही लढाई असणार आहे. ही निवडणूक कोणत्या थराला जाईल. हे सांगणं सुद्धा पुढे कठीण होईल. परंतु आतापासून मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार सर्वच पक्षात बघायला मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी चढाओढ लागली आहे. म्हणजेच बाजारात तुरी…. अशी अवस्था राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची झालेली दिसते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा ), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) आणि, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) अशा सहा प्रमुख पक्षातील नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी स्पर्धा दिसायला लागली आहे. त्यामुळे जस जसे निवडणुकीचे दिवस जवळ येऊ लागतील तसतसा मुख्यमंत्री पदाचा वाद मात्र यावेळी चांगलाच रंगणार आहे.
पुढील निवडणुका विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार, असे भाजपा वारंवार सांगत असले तरी पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे एकनाथ शिंदे यांचाच असणार आहे, हे अजूनही भाजपातील पक्ष श्रेष्ठी स्पष्ट करीत नाहीत. त्यांनी हा विषय गुलदस्त्यात ठेवला आहे. मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे हेच असणार आहेत, असे ठाम मत बनवून ते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सात खासदार निवडून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या दिल्ली दरबारी चांगलेच वजन वाढलेले आहे. सहसा केंद्रात त्यांचा शब्द पडू दिला जात नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल, असे शिंदे गटाच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
परंतु एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावावे का? याबद्दल मात्र महाराष्ट्रातील भाजपाचे ‘चाणक्य’ म्हणून ज्यांची ओळख आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक काय वाटते किंवा नुकतेच बंडखोरी करून सत्तेत सहभागी झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कितपत रुचेल, याबद्दल राज्याच्या जनतेच्या मनात साशंकता आहे.
मुळात साडेचार वर्षात राज्यात भाजपा सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष असून सुद्धा मुख्यमंत्री पदाचा मुकुट त्यांना घालायला मिळाला नाही. याची कुठे तरी मोठी सल भाजप नेत्यांच्या मनात आहेत. म्हणूनच पनवेलच्या एका पक्षाच्या चिंतन शिबिरात “छातीवर दगड ठेवून आपण मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे” अशी भाजपच्या एका मंत्र्याने आपली मळमळ बाहेर काढली होती. या वक्त्याव्यानंतर भाजपा नेत्यांना स्पष्टीकरण द्यायला नाकीनऊ आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आपल्या अनेक भाषणात किंवा बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ असा नमोउल्लेख करीत आहेत.त्यामुळे महायुतीचा भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस हे आगामी राजकीय परिस्थिती ठरविल, हे मात्र नक्की.
परंतु सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बऱ्याच दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावर आहेत. याचाही मोठा राजकीय फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसला आहे. 2019च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे 23 खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. ती संख्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकदम नऊ या एक अंकावर आली. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होऊ नये, याचे चिंतन पक्षात सुरु झाले आहे. फडणवीस यांना दिल्लीची जबाबदारी देवून त्यांच्या ऐवजी राज्याचे नेतृत्व करायला मराठा चेहरा द्यावा लागेल का? याची चाचपणी सध्या दिल्लीतील पक्ष नेतृत्व करीत आहे.भाजपात विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या तर काय होईल, याचा अंदाज पक्षश्रेष्ठी घेत आहेत. सध्या तावडे यांनी दिल्लीत आपला चांगला दबदबा निर्माण केला आहे. महाराष्ट्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. दुसरा मराठा चेहरा म्हणून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा पूर्वी पासूनच सुरू आहे. त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत.
मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने विखे पाटील बॅकफुटला गेले आहेत. अजूनही त्या दुःखातून सावरलेले नाहीत. तसे काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणि मग व्हाया कॉंग्रेस ते भाजपात आलेले आहेत. म्हणून महाराष्ट्र स्तरावरच्या मूळ भाजपातील एक गट विखे पाटील यांच्या नावाला पसंती देणार नाही, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा सरतेशेवटी विचार झाला तर त्यांचे इतर पक्षातील असलेले संबंध आणि विरोधकांना सुद्धा आपल्या निकटवर्तीय असण्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपाला होण्याची शक्यता आहे.. गडकरी हे निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे प्रामुख्याने दावेदार असूनही ते आपली इच्छा कधी बोलून दाखवत नाही. हा त्यांचा राजकीय सुसंस्कृतपणा आहे. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असेल असे गंमतीने सुद्धा ते कधी बोलून गेले नाहीत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचेही मोठे योगदान आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही.त्यामुळे नागपूरच्या आशीर्वादाने जरी ते मुख्यमंत्री झाले तर सर्व पक्षात त्यांच्या नावाचे स्वागत होईल.
ऐन गणपती उत्सवाच्या काळात मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजितदादा पवार यांनी विमानतळावर जाऊन सदिच्छा भेट घेतली. जागा वाटपाबाबत राजकीय चर्चा झाल्या. मात्र त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा लपवून ठेवलेल्या दिसत नाहीत. यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांना ही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी हवी आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघ सोडला तर राज्यातील मतदारांनी त्यांना स्पष्ट नाकारले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा आपल्या पक्षाची कशी घोडदौड सुरू ठेवतील, हे आश्चर्यकारक राहणार आहे. कारण जिथे जिथे त्यांचे उमेदवार उभे राहणार आहेत. ते पाडण्याची रणनीती गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आखली आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’च्या श्रेयवादाची लढाई या महायुतीतील तीनही पक्षात लागली आहे. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत अनेक वेळा उमटले. तरी यामध्ये मुख्यमंत्री पदावर दावा करायचा असेल तर सर्वात जास्त आमदार निवडून आणावे लागतील. याबाबत महायुतील नेत्यांना पूर्ण कल्पना आहे..
मुख्यमंत्री पदावरून महाराष्ट्रातील राजकारणात कलगीतुरा रंगला आहे. जशी महायुतीमध्ये स्पर्धा सुरु आहे. तेच चित्र महाविकास आघाडीमध्येही वेगळे नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर अधिकच आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेते तर पक्षाच्या व्यासपीठावर ‘मुख्यमंत्री होणार तर काँग्रेस पक्षाचाच’असे बडबडू लागले आहेत. ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल, या सूत्राचे जराही ह्या नेत्यांना भान राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा दाखल करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे नेहमीच्या प्रथेप्रमाणे काँग्रेस हायकमांड ठरवित असते. परंतु नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या आतापासूनच भावी मुख्यमंत्री म्हणून पक्षात चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या सभा त्यांनी गाजविल्या, त्यांच्या सभेला तुफान गर्दी असायची. अर्थात त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळे त्यांच्या शिवसेनेपेक्षा काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांला मोठा फायदा झाला. लोकसभेत काँग्रेस पक्ष एक नंबरला आला. त्यामुळे त्यांच्या शब्दाला महाविकास आघाडीत महत्व असून दिल्लीतील अनेक नेत्यांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले आहेत. आगामी विधानसभा त्यांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हायकमांडची त्याला सहमती असेल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर करावा, असा हट्ट महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे यांनी वारंवार धरला होता. परंतु ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र राहणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने, कुठे तरी या वादावर पडदा पडला आहे. सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी स्वतः साठी माघार घेतलेली दिसते.परंतु आपले लाडके चिरंजीव आदित्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री त्यांना बघायला आवडेल. कदाचित ते आपली इच्छा केव्हा तरी निश्चित बोलून दाखवतील.
नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना निश्चित वाटणार. त्यानुसार आगामी सरकार बनवितांना त्यांची महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका असणार आहे. पवार हे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आताच विचार करायला तयार नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर निर्णय घेतला जाईल, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
राजकीय तहाच्या मैदानात काटाकाटीत पवार हे शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करतील. त्यातून त्यांना यश ही मिळेल. त्यामुळे आपले राजकीय पत्ते ते शेवटपर्यंत उघडणार नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडखोरीत जेव्हा पवारांची अपेक्षित नसलेल्या समर्थकांनी साथ सोडली तेव्हा मात्र जयंत पाटील ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. उद्या जर संख्याबळानुसार शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकला आली तर जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहतील. किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करतील .
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा आजही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्याची प्रचिती लोकसभेला आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेसाठी जोरदार प्रयत्न करतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला स्वबळावर पुन्हा सत्तेवर येणे अवघड आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकमेकांची प्रामाणिक साथ द्यावी लागणार आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची बैठक आजच्या घडीला विस्कटलेली आहे. कोण कुठे जाईल, याचा थांग पत्ता लागत नाही. 1960 पासून 2024 या 64वर्षाच्या कालावधीत 20 नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले. यामध्ये काहींना दोनदा संधी मिळाली. त्यापैकी वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ मिळालेले मुख्यमंत्री आहेत. आगामी येणारा मुख्यमंत्री पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा आणि हा महाराष्ट्राचे हित जपणारा असावा याची काळजी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जागृत मतदारांना घ्यावी लागणार आहे.
-खंडूराज गायकवाड
Khandurajgkwd@gmail.com