मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच आता अवघे दोन दिवस उरले आहे. मात्र अद्याप महायुतीसह महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाहीय. यातच जर विधानसभा निवडणुकीत बहुतमत मिळालं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा असताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. पण हेही निश्चित आहे की, पुढील मुख्यमंत्री हा महायुतीमधूनच होणार. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी हे विधान केलं आहे. पक्ष फोडीवरून शिंदे म्हणाले की ‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचं धोरण आहे. राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, आपल्या पक्षाचं काँग्रेस होऊ देणार नाही. परंतु उद्धव ठाकरे स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून काँग्रेससोबत गेले. खुर्चीसाठी ते त्यांच्याकडे गेले. त्यांना वाटलं की, त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही आणि टिकणार नाही. युती तोडून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है ची घोषणा दिली होती. त्याचं समर्थनही शिंदेंनी केलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राहुल गांधींनी अभिवादन केलं. त्याचं शिंदेंनी कौतुक केलं. मात्र त्यांच्या मनात शिवसेनेविषयी आधी काय भावना होती. पंतप्रधान मोदींनी आव्हान देऊपर्यंत राहुल गांधींनी स्वत: कधी बाळासाहेबांविषयी विधान केलं नव्हतं. पण हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणावे, असंही म्हटलं आहे.