एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत रक्षा खडसेंचं महत्वाचे भाष्य
जळगाव । एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. पण आता खडसे-महाजन वाद मिटवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री मैदानात उतरले आहेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार, असा शब्दच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाले तर उत्तर महाराष्ट्राचे राजकीय स्थिती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रक्षा खडसे म्हणाल्या, नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. आणि योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजप मधील खूप जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीशभाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केले तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलेच आहे, याकडेही रक्षा खडसेंनी लक्ष वेधले.
एकना खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. गेल्या चार-पाच वर्षांपासून या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे. परंतु या दोन ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी माझी देखील प्रामाणिक इच्छा आहे. मागील काळामध्ये हे नेते एकत्र होते, तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगले झालेले आहे, असेही त्या म्हणाल्या.