धुळ्यात गांजाची शेती उद्ध्वस्त ; तब्बल सव्वा दोन कोटीचा मुद्देमाल जप्त
धुळे : धुळे जिल्ह्यातील आंबागाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात कारवाई करत सुमारे 11 हजार किलो गांजासह सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात अवैधरित्या गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
धुळे पोलिसांच्या या कारवाईबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई पोलिसांच यश आहे की अपयश? याबाबतही आता चर्चा होत आहे. गांज्याची झाड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असताना, स्थानिक पोलिसांचे याकडे लक्ष कसे दिले नाही? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या गांजा शेतीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली, मग स्थानिक गुप्तचर यंत्रणा काय कामं करत आहेत? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. पोलीस अधीक्षकांच्या माहितीवर केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडं पडलं आहे, असाही आरोप केला जात आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन गांजाच्या रोपांची पहाणी करुन पंचनामा केला. तसेच ही गांजाची रोपं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.