राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. मात्र या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पहलागाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारेअवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, असे विधान केले होते.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत देश या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. या कारवाईचे स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे आणि भारताच्या पाठिशी जग उभे आहे,” असे सांगितले. त्यानंतर आता दोघांचीही भेट झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय अंदाज बांधले जात आह

ऑपरेशन सिंदूर बाबत काय म्हणाले होते राज ठाकरे?
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. ज्या दहशतवाद्यांनी तो हल्ला केला, ते दहशतवादी तुम्हाला अजून सापडलेले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती. हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून यांना शोधून काढणे हे गरजेचे आहे. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला अजून काय बरबाद करणार?”, असे राज ठाकरे म्हणाले होते.
“हल्ला करणारे अतिरेकी तुम्हाला सापडलेले नाहीत. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. सरकारच्या चुका तुम्हाला दाखवायल्या पाहिजे. ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही. तुम्ही काय पाऊले उचलता ते महत्त्वाचे आहे,” असे राज ठाकरे यांनी म्हंटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.