मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादषीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची मोठी घोषणा केली.
आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील.”असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री म्हणाले, “आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण १२ वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे.”असे त्यांनी म्हटले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.”अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली.