बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटला: बुलढाणा जिल्ह्यातील घोटाळा
बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये तलाठ्यांनी मिळून बनावट शेतकरी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम लाटण्यासाठी केला गेला.
मागील वर्षी संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली तर काहीच्या शेती खरडून गेल्या होत्या. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अतिवृष्टीची मदत देण्यात येणार होती. मात्र, तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे आणि संगणक चालक महादेव पाटील यांनी या मदतीचा फायदा घेण्यासाठी बनावट शेतकरी उभे केले.
एका ठिकाणी बसून नुकसानीचा सर्व्हे
तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे आणि संगणक चालक महादेव पाटील या तिघांनी एका ठिकाणी बसून नुकसानीचे सर्वे करीत जे शेतकरी नाहीत, त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये शासनाकडून वसुल केले. या घोटाळ्याचा पर्दाफाश तत्काळीन तहसीलदार शीतल सोलट यांनी केला, ज्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. बुलढाणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी ऑगस्ट महिन्यापासून फरार होते, मात्र चिखली तालुक्यातील रानंत्री येथून तलाठी अनंता माठे याला ताब्यात घेतले. खामगाव मधून तलाठी उमेश बिल्लेवार तर जळगाव जामोद मधून कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर पुढील चौकशी सुरु आहे.