जळगाव जिल्ह्यात 15 दिवसात ठिकठिकाणी रक्तदान महाशिबीर होणार
जवानांना प्रेरणा, शेतकऱ्यांना हिम्मत म्हणून रक्तदान; सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव | “देशाच्या सीमारेषेवर जवान जीवाची बाजी लावून लढत आहेत, तर आपल्या भागातील शेतकरी दुष्काळाशी, संकटाशी झुंज देत आहेत. त्यात जवानांना प्रेरणा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी आपण रक्तदान महाशिबिर येत्या 15 दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राबविणार आहोत,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
यावेळी खा. स्मिता वाघ, आ. राजू भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, रेल्वेच्या भुसावळ विभागीय व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून विशेष रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.”
या अभियानांतर्गत जिल्हाभरात समन्वयाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन होईल. यात जमा होणाऱ्या रक्ताचा ५० टक्के साठा देशाच्या सीमारेषेवर कार्यरत जवानांसाठी, तर उर्वरित ५० टक्के जिल्ह्यातील आपत्कालीन गरजूंना उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सध्याच्या भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत, “देशाच्या सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या जवानांचा प्रत्येक भारतीय नागरिकाने अभिमान बाळगावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाच्या ठाम भूमिकेमुळे संपूर्ण देशाला आत्मविश्वास मिळाला आहे. हे नेतृत्व खऱ्या अर्थाने जबाबदार असून, त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.
शेवटी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी, विशेषतः युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “हे रक्तदान फक्त एक सामाजिक कर्तव्य नसून, एक देशभक्तीची कृती आहे.”