राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी
मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक लवकरच होतील. मात्र त्यापूर्वी महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त असणारे मंत्रीपदं भरले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. रिक्त मंत्रिपदासोबतच महामंडळाचं देखील वाटप करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यानं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपसोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीमधील राज्यातील प्रमुख घटक पक्ष आहेत. त्यामुळे जर पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यानं राज्यातील अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छूक असणार आहेत.