नवी दिल्ली । महाराष्ट्रातील अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज (१४) देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीशपद भूषविणारे दुसरे बौद्ध व्यक्ती असून, त्यांचा कार्यकाळ सहा महिने आणि नऊ दिवसांचा असेल. यापूर्वी 2007 मध्ये सरन्यायाधीश म्हणून न्या. के. जी. बालाकृष्णन हे पहिले बौद्ध व्यक्ती होते.
न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीतून सुरू झाला. पुढे ते नागपूरमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले. अमरावतीचे सुपुरत्र सरन्यायाधीश झाल्याने अमरावतीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा झाला. न्या. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
भूषण हे तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.गवई यांनी 1985 मध्ये अवघ्या 25 व्या वर्षी वकिली सुरू केली. काही काळ मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहाय्यक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून त्यांनी कार्य केलं.