भयंकर! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; जळगावच्या भाविकांसह १४ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : नेपाळमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. नेपाळमध्ये शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मृतांपैकी काही जण जळगाव जिल्हयातील असल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय प्रवासी घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. बसमध्ये 40 प्रवासी होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे. मात्र १४ जणांचा मृत्यू झाला आहे. केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस (UP 53 FT 7623) गोरखपूरहून नेपाळला गेली होती. बस पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी मर्स्यांगडी नदीत बस पडली. शुक्रवारी 11.30 वाजात ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये काही जण जळगाव जिल्हयातील असल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळमधील अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केली. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळात आहे. 41 भाविक बसमध्ये होते. त्यातील 14 जण ठार झाले आहेत. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात आहोत.