राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले…
राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण हा मात्र कमी होणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे असल्याचे बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही. पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत.’, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजी नगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून केला जात असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.