मुंबई/बारामती । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतली असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे आज उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी सपकाळ यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. त्याशिवाय अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगितले. भाजपसारख्या विखारी पक्षासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राहू नये, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार यांच्या घातपाताचा तपास केला जात नाही, हे महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट आहे, असे सपकाळ म्हणाले. आज सभ्यतेमुळे माघार घेत आहोत.


पण २०२९ मध्ये बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.आम्ही या पोट निवडणुकीतून माघार घेत आहे, आम्ही या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देत नसल्याचेही सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.