राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

0

मुंबई । राज्यात सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या वर गेल्याने उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. अशातच महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यापासून कर्नाटक, तमिळनाडू आणि मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेला कमी दाबाचा हवेचा पट्टा सध्या कायम आहे. यामुळे महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये आज (२६ एप्रिल) तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गडगडाटी वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.