मुंबई । राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यंदा अवकाळीने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. सोलापूर, सांगली यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्यामुळं झाडं पडून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. राज्यात मुंबईसह विविध जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वमोसमीपावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याला जोरदार तडाखा बसला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील जिल्ह्यांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. एकीकडे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पण, अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात काल (२६ मे) वादळी वाऱ्यानं प्रचंड नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या महाळंग्री, झरी, निलंगा, शिरूर अनंतपाळ यासह इतर भागातील घरावरील पत्रे देखील वादळी वाऱ्याने उडून गेले आहेत. तर चाकूर तालुक्यातल्या महाळंग्री , शिवारात उभी असलेली केळीची बाग उद्ध्वस्त झालीआहे.वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. गावातील अनेक घरांवर झाडं पडून प्रचंड मोठं नुकसान देखील झालं आहे. दरम्यान विद्युत तारा पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे.
धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड डोक्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. हनुमंत कोळपे, असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. धाराशिव तालुक्यातील सांगवी गावातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. कुटुंबीयांचे सांत्वन करून तातडीने महसूल ,आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला आहे. आर्णी, महागांव आणि पुसदमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा जिल्ह्यातील विविध भागात बसत आहे. सध्या तापमानाचा पारा ४६ अंशापुढे पोहोचला असताना अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे (Weather Forecast) आर्णी, महागांव आणि पुसद तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला आहे. आर्णी आणि महागांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे, तर पुसद तालुक्यात केळीच्या बागेचं नुकसान झालं आहे.
बुलढाणा जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सर्वात जास्त नुकसान खामगाव, मलकापूर, शेगाव, जळगावजामोद, नांदुरा, येथे झालं आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत तर शेकडो झाडे उन्माळून पडले आहेत. वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्याला चांगलाच बसला आहे. मोताळा ते नांदुरा मार्गावरील शेकडो झाडे उन्माळून पडले आहेत. त्यामुळे मार्ग बंद झाला आहे.