लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशातील सुमारे शंभर कोटी मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत अनेकांचे ‘हिशेब’ चुकते केले. धर्माचा आणि प्रभू रामचंद्र तसेच महावीर हनुमंताच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांकडे प्रभू रामचंद्र आणि महावीर हनुमंतांनी सुस्पष्टपणे पाठ फिरविली. ओतप्रोत भरलेल्या अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्याचे दिसून आले. जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे’अशा पद्धतीने सत्ता आणि सत्तेतून आलेली अहंकार युक्त मस्ती साफ साफ उतरविण्याचे महत्वपूर्ण कार्य मतदार राजाने करुन दाखविले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे आदींनी मेहनतीने ६ एप्रिल १९८० रोजी उभा केलेला भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे, निश्चित ध्येय धोरणाचे अधिष्ठान असलेला असली राजकीय पक्ष आज खऱ्या अर्थाने नको त्या व्यक्तींच्या हातात गेला आहे आणि संसदीय लोकशाहीच्या सर्वच प्रथा परंपरा नीतिमत्ता गुंडाळून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने आपली पाशवी पकड देशावर बसवू पहात आहे.
‘हुं खातो नथी अने खावा देतो नथी’ ही २०१४ पूर्वीची घोषणा अंतर्धान पावली असून भ्रष्टाचार मुक्त आणि कॉंग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात भ्रष्टाचार युक्त आणि कॉंग्रेस युक्त पक्ष करुन ठेवला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत २५ वर्षांची हिंदुत्वाच्या आधारावर तयार झालेली युती स्वतः च्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष आणि परिवार यांच्यात फूट पाडण्याचे अश्लाघ्य कृत्य करायलाही मागेपुढे पाहिले नाही. स्वायत्त संस्था आपल्या अधिपत्याखाली असल्याचा पुरेपूर फायदा उठवण्यात आला. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ही घोषणा निव्वळ भाषणापुरती राहिली आणि ठराविक लोकांचा फायदा करुन देण्यात आला. दहा वर्षे विकास विकास म्हणून गाजावाजा करण्यात आला परंतु ज्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या जन्मभूमी चा निर्णय तमाम रामभक्तांच्या बाजूने ९ नोव्हेंबर २०१९ ला दिला तो केवळ आपल्यामुळेच झाल्याचा देशभरात डंका पिटण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचविले होते की संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत राममंदिरचा निर्णय घ्यावा, परंतु ते ऐकून घेतले नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ जानेवारी २०२४ रोजी अर्धवट राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्ती ची देशभर गाजावाजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जबरदस्त इव्हेंट करण्यात आला. कारण रामनवमीच्या दिवशी निवडणूक आचारसंहिता असल्याने ते होऊ शकणार नाही म्हणून हा इव्हेंट उरकण्यात आला. अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सुशोभित करण्यात आले. एका बाजूला हा इव्हेंट असतांना दुसऱ्या बाजूला मुंबई महाराष्ट्रातील ठराविक मंडळींनी हनुमान चालिसा चा इव्हेंट चालविला. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि तब्बल सात टप्प्यात मतदान पार पडले. राममंदिर हा राजकारणाचा नव्हे तर तो अस्मितेचा विषय असल्याचे एका बाजूला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत सारे नेते बोलत असतांना ‘जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे’, अशा अयोध्येतील रामलल्ला आणि नरेंद्र मोदी नतमस्तक होतांनाची पत्रके वाटण्यात आली.
मोठमोठाले होर्डिंग्ज लावण्यात आले. इतकेच नव्हे तर पूर्व उपनगरात प्रभू रामचंद्र यांची सुमारे चारशे होर्डिंग्ज लावण्यात आली. अबकी बार चारसौ पार अशा घोषणा पक्ष आणि मित्रपक्ष मोठमोठ्याने देत होते. एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला भरभक्कम एकजुटीने उभी राहिलेली इंडिया आघाडी असा जबरदस्त सामना झाला. या जबरदस्त सामन्यात चारशे सोडा पण तीनशे पारही होऊ शकले नाही. तीन केंद्रीय मंत्री आणि एक राज्याचे कॅबिनेट मंत्री या निकालात धराशायी झाल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे जो प्रचंड गाजावाजा प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येत इव्हेंट रुपाने करण्यात आला त्याच अयोध्येतील भारतीय जनता पार्टी चा उमेदवार पराभूत होऊन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले. हनुमान चालिसाचा इव्हेंट करणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखविला. प्रभू रामचंद्र आणि हनुमंताने पाठ फिरविली तर नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदार संघातून पहिल्या तीन फेऱ्यात पिछाडीवर पाहण्याची नामुष्की पत्करावी लागली.
ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय वनवासात जाता जाता वाचविले त्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपूत्रास नकली संतान, नकली शिवसेना अशी कृतघ्न पणे अवहेलना केली. नियतीने या अहंकाराच्या अक्षरशः ठिकऱ्या ठिकऱ्या उडविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत सांगायचे तर ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ ! नीतिमत्ता पाळणारा एखादा नेता असता तर क्षणार्धात राजीनामा देऊन मोकळा झाला असता. पार्टियाॅं आती है पार्टियाॅं जाती हैं, सत्ता आती हैं सत्ता जाती हैं, लेकिन देश टिकना चाहिए, असे म्हणत पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे अटलबिहारी वाजपेयी तसेच जेंव्हा समोर माझा एक ही सहकारी माझ्या विरोधात उभा असेल तर मी पदावर राहू इच्छित नाही, असे म्हणून परिणामांची पर्वा न करता मुख्यमंत्री पद सोडणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श ठेवण्याची अपेक्षा करणे अनाठायी ठरेल. एक मात्र नक्की की या निवडणुकीत प्रभू रामचंद्र आणि महावीर हनुमान यांनी पाठ फिरविली आणि अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम यांचे नातू आणि लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य भूमि चळवळीचे अध्वर्यू प्रकाश सिलम यांनी परखडपणे प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, मोदी हैं तो मुमकीन हैं नाही तर जनता हैं तो मुमकीन हैं, हेच खरे ठरले. मुंबई ही ठाकरे यांचीच !
लोकसभेच्या या निवडणुकीने आणखी एक महत्वाचा निकाल दिला. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य नेतृत्वाखालील आणि आता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचीच हे सिद्ध झाले आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मशाल निशाणीवर निवडून आल्या. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल प्रचंड प्रमाणात धगधगली. मुंबईत अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील निवडून आले. अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला. मुंबई विभागीय कॉंग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पराभूत केले. महाराष्ट्रात ४८ पैकी महाविकास आघाडीने तीस जागा जिंकून घवघवीत यश पटकावतांना भारतीय जनता पक्षाच्या वाचाळवीरांना त्यांची जागा दाखवून दिली. मुंबई ही ठाकरे यांच्या शिवसेनेचीच हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. संसदीय लोकशाही धाब्यावर बसविणाऱ्यांना चपराक बसली. लोकशाहीचा विजय असो !
-योगेश वसंत त्रिवेदी,
९८९२९३५३२१
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)