जळगाव । सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख इतके दिवस झोपले होते का? आज त्यांना जाग आली तुम्हाला कल्पना आहे का? सीबीआयने त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्यावर दबाव टाकला होता. पण आता सीबीआय चौकशीत सत्य समोर आलंय. हा विषय कुठेतरी भरकटला पाहिजे, म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करतायत, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे.
संजय राऊतांवरही साधला निशाणा
देवेंद्र फडणवीसांमुळेच राज्यात डर्टी पॉलिटिक्स, सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं हे मला कळत नाही. हा माणूस किती बायोलॉजिकल आणि अनबायोलॉजिकल आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यांच्या म्हणण्याला कुणीही किंमत देत नाही