आदिवासी आश्रम शाळांचा आनंदी सोहळा !

0

तर, झाले असे की, आपला सर्वांचा एक लाडका, खट्याळ, विनोदी असलेला आणि चित्रकलेमध्ये सुवर्णपदक मिळवून पहिला नंबर पटकावलेला मित्र श्री रमेश कुर्जेकर हा आम्हा सर्व मित्रमंडळींना काही ना काही गमतीशीर पण थोडे डोक्याला चालना देणारे अवघड असे काही टास्क करायला लावतो की ,जेणेकरून आपला मेंदू पुन्हा कार्यरत होऊन अंगात उत्साह संचारेल .तसेच आपल्यातल्या सुप्तगुणांनाही वाव मिळेल., आणि आपल्याला आलेल्या अनुभवांची आपल्या इतर सहकाऱ्या बरोबर देवाण-घेवाण करता येईल.

तर यावर्षी त्याच्या सुपीक डोक्यातून एक अप्रतिम उपक्रम डोकावला. तो म्हणजे आदिवासी आश्रम शाळेतल्या मुलांना मदत करणे.
हा विषय आम्हा सर्वांसाठीच नवीन होता आणि ह्यातला काहीच अनुभव नव्हता. परंतु, खरोखरच सर्वांनी हा विषय खूप उचलून धरला. आणि आम्ही झटपट कामाला लागलो. आता यासाठी फंड गोळा करायचा होता. म्हणून सर्वांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे आवाहन केले .काहींनी 1000,काहींनी 2000 काहींनी 5000 तर काहींच्या मुलांनी एक हजार दोन हजार तीन हजार अशी मदत केली. आता आमचे एकूण 57000 रुपये जमले. इतके पैसे जमतील याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. असो.
आता विचार सुरू झाला की, या मुलांना आपण कोणत्या प्रकारची मदत करू शकतो, म्हणजे जर आपण आश्रम शाळेवर किंवा वस्तीच्या पाड्यावर गेलो तर तिथे किती मुले हजर असतील!! किंवा आदिवासी पाड्यावर गेलो तर तिथे किती वस्ती असेल!!!! मग सर्वांना कशी मदत करावी त्या वस्तीवर किती माणसे असतील., त्यांना कोणत्या प्रकारे मदत करता येईल?? म्हणजे ब्लॅंकेट घेतली तर किती घ्यावी ! भांडी घेतली तर कोणती घ्यावी! धान्य द्यायचं असेल तर ते कसे द्यावे, किती द्यावं, कोणतं द्यावं .,हे काही कळत नव्हतं. कारण वस्तीवर चार ब्लांकेट घेऊन जावं आणि यायची दहा लोक मग काय करणार!! एका घरात किती देणार. आपला फंड किती. त्या बजेटमध्ये सगळं बसलं पाहिजे. हा विचार डोक्यात येत होता .पण काहीतरी मदत आदिवासींना करायची हे ठरलेलं होतं. त्यामुळे मग हा विचार आम्ही बाद केला. आता आम्ही असे ठरवले की, आदिवासी शाळेत जाणारी मुलं जी संध्याकाळी आपापल्या घरी जातात त्या मुलांना आपण मदत करू या. हे मनात आल्यावर आम्हाला एक प्रकारची दिशा मिळाली. आता सर्वानुमते असे ठरले की आपण या मुलांना शालेय साहित्य पुरवण्याची मदत करू या. आता या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आमची घोडदौड सुरू झाली. अगोदर मदत करण्यासाठी शाळा निवडायच्या होत्या. त्या करता आम्ही तारापूर आणि बोर्डी येथे असलेल्या आदिवासी आश्रम शाळांना भेटी देऊया असे ठरवले.
यासाठी आम्ही अंबरनाथ मधील प्रसिद्ध व्यक्ती, रेनी रिव्हर रिसॉर्ट चे सर्वेसर्वा आणि दिलदार असे आमचे वर्गमित्र श्रीयुत विश्वनाथ पनवेलकर यांच्याशी चर्चा केली. त्याने लगेचच ह्या सूनियोजित उपक्रमासाठी 5000 रुपये दिले. आणि बोलता बोलता असे लक्षात आले की, तारापूर आणि बोर्डी या ठिकाणी ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी खूपच नावारूपाला आणलेल्या आदिवासी शाळा आहेत., आणि त्यांना सरकारी अनुदान तर आहेच., पण इतरही संस्था मदत करतात. बरे तारापूरला जायचे म्हणजे सुद्धा आम्हाला जेष्ठ नागरिकांना आठ ते नऊ तासांचा प्रवास झाला असता. त्यामुळे आम्ही असे ठरवले की इतक्या लांबची ठिकाणे न निवडता आपल्या जवळच्याच आदिवासी शाळा निवडाव्या., जेणेकरून प्रवासात वेळ जाणार नाही आणि थकवा येणार नाही.

मग आता जवळच्या शाळा कोणत्या आहेत की, ज्यांना खरोखरच घरची घरी परिस्थिती गरीब असल्यामुळे मदतीची गरज आहे. हे शोधून काढायचे होते. आता या वेळेला आमचे पत्रकारितेतील अनेक उत्कृष्ट पुरस्कारांनी सन्मानित असे वर्गमित्र श्री. योगेश त्रिवेदी यांची खूप मोलाची मदत झाली. श्रीयुत योगेशनी आम्हाला महात्मा गांधी विद्यालय चे माजी मुख्याध्यापक श्रीयुत धनंजय जठार आणि श्री शैलेश रायकर यांचेकडून शहापूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे नाव आणि फोन नंबर मिळवून दिला. त्याप्रमाणे आम्ही प्रथम शहापूरच्या अंदाड येथील सौ दीपिका वीशे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तिथेच आसपास असलेल्या इतर शाळांच्या मुख्याध्यापकांचे नंबर आणि नाव मिळवले. त्यानंतर या शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांशी बोलणे करून त्यांच्या शाळेमध्ये एकूण किती इयत्ता आहेत प्रत्येक इयत्तेत किती मुले आहेत आणि त्या मुलांच्या काय गरजा आहेत ., हे जाणून घेतले.आता आम्हाला ह्या मुलांच्या कोणत्या गरजा पुरविणे शक्य आहे या सर्वांचा विचार विनिमय केला.

एक बजेट पत्रक तयार केले.त्यानुसार चार्ट बनवला. वस्तूंची यादी केली. मग एक दिवस रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक आणि माधवी खरे म्हणजेच मी असे आम्ही तिघेजण अब्दुल रेहमान स्ट्रीट मुंबई येथे जाऊन सर्व शालेय साहित्याची खरेदी केली. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना देण्यासाठी एक पर्स आणि एक पाऊच असे खरेदी केले. दहा बस्कर पट्ट्या म्हणजे मुलांना बसण्यासाठी ज्या लांब पट्टीच्या सतरंज्या असतात त्या खरेदी केल्या. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी पाटी , (रूळ) पेन्सिलचा एक बॉक्स, दोन दुरेघी वह्या, दोन चार रेघी वह्या, दोन चौकटीच्या म्हणजे उजळणीसाठी वह्या, दोन चित्रकलेसाठी वह्या, एक रंगपेटी एक पेन्सिल बॉक्स, एक खोड रबर, एक पाटी पुसण्यासाठी डस्टर, एक शिसपेन्सिल चा बॉक्स आणि रूळ ठेवण्यासाठी पाऊच आणि एक छोटे दप्तर अशी खरेदी केली.

तिसरीच्या मुलांसाठी पाटी न घेता दोन दुरेघीवह्या, दोन-चार रेघी वह्या, दोन चित्रकलेसाठी वह्या, एक रंग पेटी, एक शिसपेन्सिल बॉक्स, आणि एक पाऊच, आणि एक दप्तर असे खरेदी केले.

आता चौथी आणि पाचवीच्या मुलांसाठी दोन दुरेघी वह्या दोन-चार रेघी वह्या दोन चौकटीच्या वह्या दोन चित्रकलेच्या वह्या एक रंग पेटी एक
सिसपेन्सिल बॉक्स एक पेन बॉक्स एक कंपास पेटी म्हणजे जॉमेट्री बॉक्स आणि एक दप्तर असे खरेदी केले.
सर्व शाळांची मिळून एकूण 108 मुले होती.
त्यापैकी पहिलीची 19, दुसरीची 24, तिसरीची 22 ,चौथीची 23, आणि पाचवीची 20 . अशी मुले होती. ह्या 108 मुलांसाठी ही सर्व खरेदी केली.
तसेच अंदाड येथे एक पहिली ते सातवी अशी शिर्के सरांची जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिथे 87 मुले आहेत. त्या मुलांसाठी प्रत्येकी दोन चित्रकलेच्या वह्या एक रंगपेटी, एक पेन्सिल बॉक्स, खोड रबर असे सर्व साहित्य खरेदी केले. हे सामान या दुकानातून त्या दुकानात नेण्यासाठी रत्नाकर आणि सिद्धार्थ या दोघांनी खूपच मेहनत घेतली.

हे सर्व सामान घेण्यासाठी आम्ही सकाळी साडेनऊला घरातून निघालो होतो. रात्री साडेअकराला घरी पोहोचलो.
हे सर्व सामान माझ्या घरी अंबरनाथला आणले आणि दुसऱ्या दिवशी सरोज राणे ,भारती चव्हाण, प्रतिभा धर्माधिकारी आणि मी व माझे पती श्रीयुत विजय खरे असे सर्वांनी मिळून ह्या सर्व साहित्यांचे वेगवेगळे गठ्ठे करून प्रत्येकी दप्तरामध्ये भरण्याचे काम केले. प्रत्येक शाळेच्या इयत्ता प्रमाणे वेगवेगळ्या पिशव्या बनवल्या.
आता दुसऱ्या दिवशी कधी एकदा निघतोय आणि त्या मुलांना हे देतोय असे आम्हाला झाले होते.
सकाळी साडेदहा वाजता आम्ही निघालो. 12:30 ला पोहोचलो.शहापूरच्या अंदाड येथील विशे मॅडमच्या शाळेला भेट दिली. त्यांनी आमचे खूप उत्तम प्रकारे स्वागत केले. प्रथमदर्शनीच तिथे गेल्याबरोबर माननीय भाऊसाहेब परांजपे यांचा फोटो बघून आम्हाला खूप आनंद झाला.त्यांच्या शाळेसाठी त्यांना एका मोठ्या लोखंडी शिडीची आवश्यकता होती. त्याकरिता त्यांना रुपये 3000 दिले.
त्यानंतर शहापूर मधील अंदाड येथील श्री शिर्के सरांच्या शाळेत गेलो. तेथे 87 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.
त्यानंतर हिव येथील सौ चौधरी मॅडमच्या शाळेत गेलो. तेथील 28 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर सपाट पाडा येथील श्री कुंदे सर यांच्या शाळेत गेलो तिथे 24 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर मानेचा पाडा येथील श्री चव्हाण सर यांच्या शाळेत गेलो तेथे 26 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. त्यानंतर मानेचा पाडा येथील श्री पाटील सर यांच्या शाळेत गेलो तेथे 30 मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.

खरोखर ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना केलेली मदत ही अतिशय मोलाची असते आणि आम्हाला ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. कारण एकाच वेळेला आपल्याला कोणीतरी इतक्या भेटवस्तू देतय म्हटल्यावर त्या निरागस बालकांचा आनंद गगनात मावेना असाच झाला., आणि हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचे भाग्य आम्हा सर्व सवंगड्यांना लाभले हे आमचे किती थोर नशीबच म्हंटले पाहिजे.
काही ठिकाणी तर शेताच्या बांधांवरूनच चालत शाळेत जावे लागते. तसेच काही ठिकाणी मातीचा रस्ता आणि पायवाट अशा वाटेने जावे लागते. प्रत्येक शाळा घरापासून कितीतरी लांब असते. काही शिक्षक आम्हाला सांगत होते की, आमच्या शाळेतली मुले एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. काही शिक्षक म्हणाले आमच्या शाळेतल्या मुलांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते. म्हणजे किती प्रेमाने आणि मायेने हे शिक्षक त्यांना शिकवतात की त्या मुलांना एकही दिवस शाळा बूडवावी असे वाटत नाही. खरोखर धन्य आहेत ते शिक्षक जे मुलांवर असे उत्तम संस्कार करतात.
एक गोष्ट मला इथे मुद्दामून नमूद करावीशी वाटते की, या सर्व शाळांमधल्या मुलांनी देवाची प्रार्थना म्हणून आणि स्वागत गीत गाऊन आमचे उत्तम प्रकारे स्वागत केले. शाळेतल्याच मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले पुष्पगुच्छ आम्हाला दिले. आम्हाला ही गोष्ट फारच कौतूकास्पद वाटली. कारण या सर्वांनमागे शिक्षकांचे उत्तम संस्कार दिसून येतात. तसेच शिक्षकांनी आम्हाला छोटासा अल्पोपहारही दिला.
आपण बहात्तर चे विद्यार्थी इतकी जुनी मैत्री योग्य तऱ्हेने टिकवून ठेवली आहे. आणि असा काहीतरी उपक्रम करतोय याचे त्या सर्व शिक्षकांना खूपच अप्रूप वाटले. कारण ते म्हणाले आतापर्यंत कितीतरी संस्था मदत करतात. पण कोणीतरी माणसांचा एखादा ग्रुप आपल्याला इतकी मदत करतोय हे आम्हाला खरंच खूप कौतुकास्पद आहे. हे त्यांचे बोल ऐकून आम्हाला अगदी धन्य वाटले.. म्हणूनच मी आज सर्व उपक्रमाला एक आनंदाचा सोहळा
असे म्हटले आहे. -भारती सातघरे -खरे, अंबरनाथ +91 98811 51218 (लेखिका अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयच्या माजी विद्यार्थिनी आहेत).

Leave A Reply

Your email address will not be published.