पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; ८ जण ठार, अनेक जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालमधून रेल्वेला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्याला निघालेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला सिलिगुडी इथं मालगाडीने धडक दिली. यएक्सप्रेसच्या एका डब्याचा चुराडा झाला आहे. तर एक डबा उभा राहिला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठा धक्का बसल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. बचावकार्य वेगाने सुरू असून रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ एकत्र काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य केलं जात आहे.
सिलिगुडीत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे बचावकार्यातही अडथळा येत आहे. ज्या मार्गावर अपघात झालाय तो कोलकात्याहून सिलिगुडीपर्यंतचा मुख्य रेल्वे मार्ग आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास रंगापानी स्टेशनवरून एक्सप्रेस निघाली होती. या गाडीला मागून मालगाडीने जोरात धडक दिली. मागच्या बाजूला एसएलआर, पीसीएल व्हॅन आणि जनरल डबा होता. यात एसएलआर डब्याचं मोठं नुकसान झालं आहे.