घोटीत होणार १०० खाटा क्षमतेचे उपजिल्हा रुग्णालय
उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार खोसकरांकडून ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर..
इगतपुरी । तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणुन ओळख असलेल्या घोटी ग्रामीण रुग्णालयाचा आता विस्तार होणार आहे. पूर्वी ३० खाटांचे असलेले रुग्णालय आता १०० खाटांच्या क्षमतेचे आधुनिक व अद्यावत असे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून उपजिल्हा रूग्णालय मंजुरीसाठी ८५ कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
यापुर्वीही ग्रामीण रुग्णालयासाठी साडे आठ कोटी रुपये देऊन नर्सिंग क्वार्टर व शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच घोटी शहरात असलेल्या बस स्थानकात सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणुन अद्यावत नविन बस स्थानक बांधण्याकरिता ९ कोटी रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे घोटी शहरात उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते. बऱ्याच दिवसांपासून भुयारी गटारी बांधण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांची होती. याच मागणीचा विचार करून भुयारी गटारी बांधण्याकरिता २ कोटी रूपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या घोटी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होत असल्याने आता याचा उपयोग महामार्गावर होत असलेल्या अपघातातील जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत होते.
परिणामी काही जखमी रुग्ण वाटेतच दगावत होते. आता मात्र यापुढे जखमी रुग्णांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची गरज भासणार नाही. तसेच घोटी शहराच्या आसपास जवळपास शंभर गावांतील वाड्यापाड्यातील नागरिकांना या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ होणार आहे. घोटीत उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांच्यासह नागरिकांनी पाठपुरावा केला होता. ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात होत असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गोरे, श्रीमती.सविता परदेशी डॉ.मीनाक्षी ठाकूर, श्री.सुभाष आवारी, पंढरीनाथ बोराडे , दिनकर जाधव, भास्कर हिंडे, संभाजी पाटील, अजित जाधव, सागर कर्पे, रुपाली वाघमारे, सुधा गोरडे, पल्लवी जगताप, संजीवनी भगत यांनी आनंद व्यक्त केला आहे.
घोटीत अद्यावत रुग्णालय नसल्याने अनेक सोयी सुविधांचा अभाव होता. त्यामुळे अपघातातील गंभीर रुग्ण, अडलेल्या प्रसुती, तीव्र स्वरूपाची झालेली विषबाधा आदी रुग्णांना नाशिक किंवा खाजगी हॉस्पीटलचा आधार घ्यावा लागत होता. आता मात्र घोटीतच अद्यावत उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने सर्वसामान्य माणसाला याचा अधिक फायदा होईल.
– उदय जाधव, माजी जि. प. सदस्य