नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जळगाव जिल्ह्यासाठी १५ कोटी ७७ लाखांची मदत – मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ७७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्यात २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीत शेतकऱ्यांना सुमारे ५ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात राज्यातील १ कोटी २ लाख शेतकऱ्यांच्या ७९ लाख ८३ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी सुमारे १५ हजार ८१७ कोटी रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत सदस्य अमोल जावळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.


मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, मदत देताना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या निकषांनुसार मदत करण्यात येते. विशेष बाब म्हणून नुकसानभरपाईसाठी असलेली २ हेक्टरची मर्यादा वाढवून ३ हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. तसेच पूर किंवा पाण्याखाली गेलेल्या शेतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदस्यांनी मांडलेल्या बाबींचा अहवाल मागवून संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी यावेळी सांगितले.