जळगाव जिल्ह्यास पीक नुकसानीपोटी ३०० कोटींची मदत !

0

जळगाव – जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका केली जात होती. प्रत्यक्षात, जिल्ह्यासाठी शनिवारी सुमारे ३०० कोटींची तातडीची मदत जाहीर झाली. त्याचे वितरण दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयांकडून केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने सुमारे दोन लाख ४७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन तीन लाख २५ हजार ३९ शेतकरी बाधित झाले आहेत. संबंधित सर्व शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी अखेर शासनाने शनिवारच्या जीआरनुसार २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्याचे वितरण तातडीने करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

प्रति हेक्टरी १० हजार अतिरिक्त
दरम्यान, शासनाने जाहीर केलेली आताची ही मदत फक्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधील प्रति हेक्टरी १० हजार रुपये अतिरिक्त मदत वेगळी देण्यात येणार आहे. दिवाळी आणि सुट्टीच्या काळातही तहसील कार्यालयांमधील मदत वितरणाचे काम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.