शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
वर्धा : विधानसभा निवणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीकडून शेतकरी कर्ज माफीचे आश्वासन दिले गेले होते. मात्र महायुती पुन्हा सत्तेत येऊन या सरकारला ९ महिन्याहून अधिकचा काळ उलटला तरी अद्यापही शेतकरी कर्ज माफीवर कोठलाही निर्णय झाला नाहीय. यातच विरोधक शेतकरी कर्ज माफीवरून सरकारला घेरत आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल.
शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योग्य वेळ आल्यावर कृषी कर्जमाफी दिली जाणार आहे. आमच्या जाहीरनाम्यात याचा समावेश आहे. त्यामुळे योग्य वेळ कधी येणार, ते आम्ही सांगू. सध्या ‘लाडकी बहीण’ योजना आणि २० हजार कोटींची वीजमाफी देण्यात आली आहे. पुढील पावलं उचलताना सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२१) सांगितले.
वर्धा
अजित पवार वर्धा दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्हा नियोजनचा आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राजकारणात चढ-उतार येत असतात, लोकं येतात आणि जातात. परंतु आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले .