जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून मान्सून दाखल होईल?
जळगाव । राज्यात मान्सून दाखल झाला. मात्र त्यापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. आहे. दरम्यान अजलगाव जिल्ह्यात शनिवारी काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यांनंतर रविवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते, तसेच काही प्रमाणात वारेही वाहत असल्याने, जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘शक्ती’ हे चक्रीवादळ धडकणार असले, तरी त्याचा फारसा परिणाम जळगाव जिल्ह्यावर सध्या तरी होताना दिसून येत नाही.
मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यास जळगाव जिल्ह्यातही दमदार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ५ मेपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून, अजून ३१ मेपर्यंत पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
१ ते ३ जून दरम्यान जिल्ह्यात सूर्यदर्शन होऊन, तापमानात वाढ होऊ शकते. मात्र, ५ जूननंतर जिल्ह्यात मान्सून दाखल होऊन जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी रात्री काही तालुक्यात पावसानेही हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.