जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

0

मुंबई । गेल्या रविवारी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यांनतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता खातेवाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.

महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. महायुतीकडून खातेवाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.

महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच
सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले. गेल्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता देखील त्यांनाच पालकमंत्री पद द्यावे, अशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. मात्र जिल्ह्यात महायुतीमध्ये भाजपचे ५ आमदार तर शिवसेनेचे चार आमदार आणि अजितदादा गटाचा एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे ज्यांच्या जास्त जागा त्यांचा पालकमंत्री असा कयास लढवला जात असल्याचं समजत आहे. मात्र कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत. त्यामुळे मुंबईतील पालकमंत्रिपदी कोण विराजमान होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.